नाशिक विधान परिषद निवडणूक; फक्त प्रचार थांबवणार पाठिंबा नाही, गोकुळ गीते यांच्या विधानाने सस्पेन्स कायम
कुठलाही घोडेबाजार झाला नाही. माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी प्रचार थांबवतो, मात्र पाठिंबा देणार नाही, असं अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी म्हटलं आहे.

कुठलाही घोडेबाजार झाला नाही. माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी प्रचार थांबवतो, मात्र पाठिंबा देणार नाही, असं अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी म्हटलं आहे.
नाशिक – मागील सहा दिवसांपासून विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या माघारीवरून सुरू असलेला ड्रामा अखेर संपुष्टात आलाय. मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांच्या घरी त्यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. यानंतर गोकुळ गीते यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
आपण प्रचार थांबवणार, मात्र पाठिंबा जाहीर करणार नाही असं म्हणत त्यांनी निवडणुकीत सस्पेन्स कायम ठेवला आहे. अशात अर्ज माघारीची तारीख उलटून गेल्यानं नरेंद्र दराडे यांना निवडणुकीला सामोर जावं लागणार आहे.
नाशिकची जागा महायुतीला सुटल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात प्रथम भाजपाचे गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या पाठोपाठ त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. गणेश गीते यांच्यावर पक्ष नेतृत्वाकडून दबाव आल्यास गोकुळ गीते स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतील ही त्यांची रणनीती होती. त्यानुसार कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशावरून माघारीच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र त्यानंतरही गोकुळ गीते रिंगणात कायम होते. त्यांनी आपला प्रचार सुरू केला होता. दरम्यान उमेदवार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी एका नगरसेवकाला केलेल्या फोनची ध्वनिफीत बाहेर पडली. त्यात गोकुळ गीते काय त्याच्या बापालाही माघार घ्यावी लागेल असं विधान केल्यानं गोकुळ गीते यांनी संताप व्यक्त करत आपण माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती.
अशी फिरली चक्रे – महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना 99.99 टक्के गोकुळ गीते पाठिंबा देतीलच आणि अगदीच नाही दिला तरी महायुतीच्या उमेदवाराला ना भूतो अशा विक्रमी मताधिक्याने विजयी करू, ती जबाबदारी आमची असल्याचं सांगत आमदार दराडे यांना विश्वास दिला. तेथून मग सूत्रे अत्यंत वेगाने हलायला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये गोकुळ गीते यांना समजावल्यावर अखेर गीते यांना माघार घ्यावी लागली, अशी माहिती समोर येत आहे.
मी प्रचार थांबवतो – काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी विनंती केली की, आपण माघार घ्यावी. तसंच दोन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे हे देखील माझ्या संपर्कात होते. ते देखील मला विनंती करत होते. मात्र महायुतीच्या उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये नाराजी होती. अनेकांनी आपण माघार घेऊ नये अशी मला विनंती केली माझ्या कार्यकर्त्यांचा देखील रेटा होता. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मला विनंती केल्यानं माझा प्रचार थांबवत आहे. कुठलाही घोडेबाजार झाला नाही. मला कौटुंबिक शांती हवी आहे. माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी प्रचार थांबवतो, मात्र पाठिंबा देणार नाही, असं अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी म्हटलं आहे.

