महिलांना एआय ट्रेनिंग देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शक्ती संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबई : महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगानं पुढाकार घेतला असून राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यामानं महिला सक्षमीकरणासाठी मुंबईमधील हॉटेल ट्रायडेंटमध्ये दोन दिवस शक्ती संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शक्ती संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरकारनं महिला आयोगाच्या मदतीनं महिलांसाठी काय काम केलं, याची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पहिले राज्य आहे, ज्यानं मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ट्रेनिंग दिलं, असं सांगितलं.
सरकारी धोरण जागृत ठेवतात, याचा आनंद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “समाजात महिलाचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात दिसायला हवं, हेच अपेक्षित आहे. महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांबाबतीत ज्या काही समस्या असतात. त्या दूर करून समता आणि समानता कशी आणू शकते, याच्यावर लक्ष दिलं जातं. या माध्यमातून महिला सुरक्षा, शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा विविध विषयावर आयोगाचे माध्यमातून काम केलं जातं. मला आनंद आहे की, केंद्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग सरकारी धोरण जागृत ठेवतात. जर सरकार काही गोष्टी करत नसेल तर त्यांना पुन्हा ट्रॅकवर आणण्याचं काम महिला आयोग करत आला आहे.”
नरेंद्र मोदी लैंगिक समानतेचे पुरस्कर्ते : “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लैंगिक समानतेचे पुरस्कर्ते आहेत. आपण जर प्रबोधन अपेक्षित करत असू तर ते लैंगिक समानतेमधूनच शक्य होईल. ज्या देशांनी आज प्रगती केली. तिथं सुरुवातीला लैंगिक समानता आणली गेली आणि त्यातूनच अनेक गोष्टी शक्य झाल्या. तसंच विकसित भारत देखील तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आपल्या लोकसंख्येच्या 50 टक्के वाटा हा महिला भागीदार असतील. मागील दहा वर्षांत पंतप्रधानांच्या सर्व योजना या महिला केंद्रीत योजना आहेत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
संविधानाच्या माध्यमातून आपण पुढं जाऊ शकतो : “युरोप, अमेरिका, जपान, चायना या सर्व विकसित अर्थव्यवस्था आहेत. आपण त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेकडे पाहिलं तर तिथं देखील जोपर्यंत त्यांनी लैंगिक समानता आणली नाही. तोपर्यंत त्यांना विकसित सामाजिक व्यवस्थेकडे पाहिले गेलं नाही. ब्रिटन सारख्या आधुनिक समजल्या जाणाऱ्या देशाला देखील महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला ते मतदानाचा अधिकार देऊ शकले. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व अधिकार दिले. याच संविधानाच्या माध्यमातून आपण पुढं जाऊ शकतो,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
महिलांना एआय ट्रेनिंग : “आम्ही सरकार म्हणून जे कर्ज देतो, त्यात पुरुषांकडून कर्ज परत येण्याचं प्रमाण 50 टक्के आहे. तेच महिलांना जेव्हा आम्ही कर्ज देतो, तेव्हा तेच प्रमाण 100 टक्के दिसून येतं. मागील वर्षी 50 लाख लखपती दीदी तयार केल्या. यावर्षी आणखी 50 लाख लखपती या, आम्ही बनवणार आहोत. या महिला लखपती दीदी आपल्या मेहनतीनं बनणार आहेत. आम्ही फक्त त्यांना पाठबळ देणार. आम्ही एक करोड महिलांना लखपती बनवलं याच क्रेडिट घेणार. महाराष्ट्र पहिले राज्य आहे, ज्यानं मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग दिलं. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही मॉल तयार करत आहोत. हे मॉल महिला बचत गटांसाठी डेडिकेटेड असतील,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

