महत्वाचे

समतेच्या वाटचालीला गती देणारे नेतृत्व; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाम संदेश

जिल्हा प्रतिनिधी अमरावती : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान केला असून, या मूल्यांवरच देशाची लोकशाही भक्कमपणे उभी आहे, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असा सूचक संदेश त्यांनी दिला.
भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आयोजित ‘समता सप्ताह’ कार्यक्रमात विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि लाभ वितरणाचा सोहळा सामाजिक न्याय भवन येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बावनकुळे उपस्थित होते.
कार्यक्रमास संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, प्रादेशिक उपायुक्त माया केदार तसेच सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी भारतीय संविधानाची एकात्मता टिकवून ठेवण्यातील भूमिका अधोरेखित केली. “आज १४० कोटी भारतीय एका सूत्रात बांधले गेले आहेत, ती संविधानाचीच ताकद आहे,” असे ते म्हणाले. ‘समता सप्ताह’ हा केवळ औपचारिक उपक्रम नसून, तो सामाजिक सक्षमीकरणाचा प्रभावी मंच ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील इर्वीन चौकात डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शिक्षण हा सामाजिक उन्नतीचा पाया असल्याने कोणताही विद्यार्थी केवळ सुविधांच्या अभावामुळे मागे राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरच्या धर्तीवर अमरावतीतही विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका व ई-लायब्ररी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कार्यक्रमात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या वतीने नोकरीचे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. तसेच ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले.
समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये व अभ्यासिकांमध्ये शिक्षण घेऊन शासकीय सेवेत दाखल झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती’, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती तसेच विविध योजनांच्या लाभांचे वितरणही यावेळी करण्यात आले.
याच प्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण पखाले यांनी पार पाडले.
एकूणच, संविधानाच्या मूल्यांची पुनर्स्मृती करून देत, समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने हा उपक्रम ठोस पाऊल ठरत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.