पाम बीच मार्गावर भुयारी रस्त्यासाठी ४४० झाडांचा बळी; बहुतांश देशी झाडे, नागरिकांचा विरोध
पामबीच मार्गावर सानपाडा येथे भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. मात्र या कामात तब्बल ११४ झाडांचा बळी जाणार असून ३२१ झाडे स्थलांतरित केले जाणार आहेत.

नवी मुंबई: पामबीच मार्गावर सानपाडा येथे भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. मात्र या कामात तब्बल ११४ झाडांचा बळी जाणार असून ३२१ झाडे स्थलांतरित केले जाणार आहेत. याला नागरिकांच्या कडून तीव्र विरोध होण्याची चिन्हे आहेत. स्थलांतरित झाडे मूळ धरत नसल्याने ९० टक्के झाडांचा बळी जातो.त्यामुळे ११४ नव्हे तर ४४० झाडांचा बळी जाणार आहे असा दावा पर्यावरण वाद्यांनी केला आहे. या संदर्भात तोडल्या झाडांवर महानगर पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.
नवी मुंबईत पामबीच वर अरेंजा कॉर्नरते कोपरी सिग्नल दरम्यान उड्डाणपुलासाठी सातशे पेक्षा अधिक झाडांचा बळी घेतला जाणार होता. यांच्या विरोधात तत्कालीन आमदार आणि विद्यमान वनमंत्री गणेश नाईक यांनी भर उन्हात चार किलोमीटर पायी मोर्चा काढला होता. त्यामुळे हा प्रकल्प जवळपास बासनात गुंडाळला गेला आहे. मात्र असाच झाडांचा बळी घेणारा पामबीच मार्गावर दुसरा प्रकल्प होऊ घातला आहे. सानपाडा येथे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.या येऊ घातलेल्या भुयारी मार्गाच्या उभारणी कामाकरता तब्बल ११९ झाडे कापली जाणार आहेत व ३२१ झाडांना स्थलांतरित करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाची नोटीस पाम बीच परिसरात मनपा तर्फे लावण्यात आली आहे.
सदर भुयारी मार्ग हे अशाप्रकारे पर्यावरणाची हानी करून होणारा असेल तर नक्की कशा स्वरूपाचा विकास होत आहे असा प्रश्न येथील रहिवाशी विचारीत आहेत.सानपाडा पाम बीच परिसर व सेवा मार्गावर खूप चांगल्या प्रकारे झाडांची रांग उभी आहे. त्यामुळे या भागात व्यायाम करणाऱ्यांची व चालणाऱ्यांची वर्दळ असते. झाडांमुळे इथले वातावरण प्रसन्न व स्वच्छ असते. आता भुयारी मार्गाच्या नावावर जर मनपा इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची छाटणी करणार असेल तर येथील रहिवाशी शांत बसणार नाहीत.रहिवाशांनी मनपा सोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे व सह्यांची मोहीम देखील सुरू केली आहे. गुरुवार २९ जानेवारीला येथील रहिवाशांचे एक शिष्टमंडळ वॉर्ड ऑफिसला भेट देणार आहे व आपले निवेदन देऊन विरोध प्रकट करणार आहे.विशेष म्हणजे नुकतेच मनपा आयुक्त यांना उच्च न्यायालयाने हवेची गुणवत्ता न राखल्यामुळे फटकारले आहे व त्यांचा वेतन बाबत कडक निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे म्हणणे महानगरपालिका किती गांभीर्याने घेते हे महत्वाचे ठरणार आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
सतीश निकम (अध्यक्ष, नवी मुंबई सिटीझन्स फाउंडेशन ): यापूर्वीही असा प्रयत्न झाला होता. मात्र जन रेट्याने तो महानगर पालिकेला मागे घ्यावा लागला. आम्ही वृक्षतोडी विरोधात मैदानात उतरलो आहोत. महानगर पालिकेच्या ध्येय धोरणांच्या विरोधात आम्ही नसून गरज नसताना निसर्ग हानी करून विकास नको.
तोडण्यात येणारी झाडे
रेन ट्री – २२
आंबा २
निम १
कॅशिया – २
शंकासुर २
बदाम ३
आदी
स्थलांतरित करण्यात येणारी झाडे
नारळ – ७
रेनट्री ४६
सुबाभूळ ४३

