महाराष्ट्र

“स्वप्नांना पंख देणाऱ्या कर्तृत्वाचा गौरव” – सुरवाडी येथे श्री आझाद खान यांचा भव्य सत्कार

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती  : गावच्या मातीशी नाळ जोडून ठेवत राज्यपातळीवर कार्याची छाप उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या जिद्दीचा उत्सव असतो. सुरवाडी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत भरलेल्या स्नेहसंमेलन व “शोध एकलव्याचा” या विशेष कार्यक्रमात समाजकार्य, शिक्षणप्रबोधन आणि युवक घडविण्याच्या कार्यासाठी ओळखले जाणारे श्री आझाद जामा खान यांचा मान्यवरांच्या हस्ते हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.
लहानशा खेड्यातून उभा राहून मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या श्री खान यांनी आपल्या कार्यातून अनेक तरुणांच्या आयुष्याला दिशा दिली आहे. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनातून बेरोजगार युवकांना सक्षम बनविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. नागपूर येथील भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्राचे (SIAC) माजी विद्यार्थी असलेल्या खान यांनी स्वतःची स्वप्ने समाजाच्या स्वप्नांशी जोडली.
अक्षर मानव संघटनेत राज्यस्तरीय जबाबदारी
अक्षर मानव संघटनेच्या कार्यातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. विविध पदांवर कार्यरत राहिल्यानंतर त्यांची महाराष्ट्र राज्य नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राज्यभर काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सुरवाडी येथे त्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. ललिता बोराळकर यांच्या हस्ते झाले. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री खान यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रेरणास्थान असलेल्या त्यांच्या मातोश्रींचाही सन्मान करून “आईच्या संस्कारांची शिदोरीच यशाचा खरा पाया असतो” हा संदेश अधोरेखित करण्यात आला. त्यांच्या पत्नी सौ. अश्विनी वितोंडे-खान या देखील उपस्थित होत्या.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार, अक्षर मानव संघटनेचे विविध पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री खान यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावाचा अभिमान, युवकांसाठी प्रेरणा
गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री आझाद खान हे आज युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. एका छोट्या गावातून उभा राहून राज्यस्तरावर काम करताना त्यांनी जपलेली नम्रता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे सुरवाडी व तिवसा परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन सौ. संध्या जांबकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दलवीर व्यास सरांनी मानले. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग आणि अक्षर मानव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.