सोमवारी मुंबई विमानाची फेरी रद्द, नियोजन कोलमडले
मंगळवारी दुपारी विमान मुंबईकडे रवाना, पेट्रोल नव्हे नाइट लँडिंगचा अभाव

अमरावती : बहुप्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाहून विमानसेवा सुरू झाली असली, तरी विमानतळावर नाइट लैंडिंगची सुविधा नसल्याने सोमवार, २६ मे रोजी मुंबईकडे जाणारे एअरलाइन्सचे एटीआर ७२ विमान रद्द करण्यात आले.
त्याऐवजी हे विमान मंगळवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी मुंबईकडे झेपावले. पेट्रोल संपल्यामुळे विमानसेवा रद्द झाली नाही, असे विमानतळ व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.
अमरावती विमानतळाहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी तीन दिवस मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. अमरावती ते मुंबई, मुंबई ते अमरावती या विमानसेवेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. एअरलाइन्सचे एटीआर ७२ विमानसेवेला प्रवाशांची पसंती सुद्धा आहे. अधूनमधून विमानाचे विलंबाने ये जा सुरू असते. मात्र, सोमवारी मुंबईत पाऊस आणि खराब वातावरणामुळे अमरावती विमानतळावर सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी विमानाचे लॅडिंग झाले. विलंबाने विमानाचे आगमन आणि अंधार झाल्यामुळे मुंबईकडे विमानाचे टेक ऑफ होणे शक्य नव्हते. त्यामुळे अमरावती-मुंबई विमानसेवेची फेरी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. २१ मे रोजी सुद्धा अमरावती ते मुंबई विमान नियोजित वेळेनुसार ४:३० ऐवजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मुंबईकडे झेपावले होते, हे विशेष.

