आषाढी यात्रा विशेष! भाविकांसाठी आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांच्या अध्यक्षतेखाली श्रीविठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली होती. सदर बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात होता.

मुंबई- आषाढी यात्रा कालावधीत श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीमार्फत मुबलक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. श्रीविठ्ठलाचे सुलभ आणि जलद दर्शन व्हावे, यासाठी आज 27 जूनपासून विठ्ठल–रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार आहे. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मागील काही दिवसांत श्रीविठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली होती. सदर बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात होता. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.
जलद दर्शन उपलब्ध करून देण्यावर मंदिर समितीचा भर : आषाढी यात्रेत भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्यावर मंदिर समितीचा भर राहणार असून, दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून वॉटरप्रूफ मंडप, 4+6 पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाईव्ह दर्शन, कुलर फॅन, सार्वजनिक सूचना प्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षारक्षक नियुक्ती, आपत्कालीन सुविधा, चहा खिचडी वाटप, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, 24 तास अन्नछत्र, बॅग स्कॅनर मशिन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम इत्यादी स्वरूपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मंदिर समितीच्या वतीने टोकन व्यवस्था : मागील काही दिवसांपासून भाविकांच्या सोयी सुविधेकडे मंदिर समितीने लक्ष दिले असून, व्हीआयपी दर्शन बंद केले आहेत. भाविकांचा दर्शन रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचवा, यासाठी मंदिर समितीच्या वतीने टोकन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये दररोज 1200 भाविकांना टोकन देण्यात येत होते. मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचे आमंत्रण देण्यात आले आहे. मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी 13 लाख 50 हजार बुंदीच्या लाडूचा प्रसाद तयार करण्यात आला असून, त्याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

