मराठी कार्यकर्त्यांची तुलना पहलगाम येथील दहशतवाद्यांशी, भाजपा नेते शेलारांच्या वक्तव्यामुळे वाद, जितेंद्र आव्हाड यांनी दिलं प्रत्युत्तर
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू झाला.

मुंबई : राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री भाजपा नेते आशिष शेलार यांनी मनसे आणि शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांची तुलना पहलगाम येथील दहशदवाद्यांशी केली. यावर आता विरोधकांनी संताप व्यक्त केला असून मराठी माणसाची तुलना दहशतवाद्यांशी करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. अशा स्थितीत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा याच मुद्यावरून गाजण्याची शक्यता आहे.
‘कार्यकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करणं चुकीचं’ : वास्तविक, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीत न बोलल्यानं मीरा रोडवरील एका मिठाई दुकानदाराला मारहाण केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री आशिष शेलार यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “पहलगाममध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, इथं मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहेत.” आता याला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी मारहाण करण्याचं समर्थन करत नाही. दुराग्रह, द्वेषाचंदेखील समर्थन नाही. उत्साहाच्या भरात मारहाण झाली असेल तर कार्यकर्त्यांना थेट पहलगाम हल्ल्याच्या दहशतवाद्यांशी जोडणं जरा अतीच झालं. मराठी माणसाला तुम्ही दहशतवादी म्हणत आहात हे चुकीचं आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
निरहुआचं ‘ठाकरे बंधू’ना खुलं आव्हान : भोजपूरी अभिनेता आणि भाजपाचा प्रचारक दिनेश लाल यादव निरहुआ यानंही महाराष्ट्रातील भाषावादावर आपलं मौन सोडलं आहे. याबाबत बोलताना निरहुआनं ‘ठाकरे बंधूं’ना खुलं आव्हान दिलं आहे. “मला मराठी येत नाही. मी भोजपुरी बोलतो आणि महाराष्ट्रात राहतो. तुम्ही गरीब लोकांना का बाहेर काढत आहात? जर तुमच्यात हिंमत असेल तर मला बाहेर काढून दाखवा. मी तुम्हाला आव्हान देतोय. भाषेवरून लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं घाणेरडं राजकारण बंद करा,” असं निरहुआनं म्हटलं आहे.
निरहुआला जितेंद्र आव्हाड यांचं उत्तर : निरहुआच्या या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. आव्हाडांनी सांगितलं की, “मुंबई महापालिकेआधी मराठी विरुद्ध अमराठी सुरू आहे. आता दलित विरुद्ध सवर्ण असे वाद लावले जातील. कोण हा निरुहुआ त्याला कोण ओळखतं? आम्ही जसं प्रेमानं वागतो, राहतो आपण तसंच राहूयात.”
‘असे आणखी 10 जण तयार होतील’ : दुसरीकडे पुणे रेल्वे स्थानकात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची नासधूस करण्याचा प्रयत्न सुरज शुक्ला नामक युवकानं केला. या आरोपीनं भगवे कपडे परिधान केले होते. याबाबत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की, “ही मानसिक विकृती आहे. देशात लढाई नथुराम आणि तुकाराम यांच्या विचारांची आहे. आपण जगाला काय संदेश देत आहोत? गांधींनी तीन गोळ्या झेलल्यानंतरही शेवटी ‘हे राम’ म्हंटलं. त्या व्यक्तीवर कारवाई होणार नाही, तसे अजून 10 जण तयार होतील.”

