न्या. भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा संविधानावरील हल्ला — प्रेमकुमार बोके

अंजनगाव सुर्जी : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला केवळ न्या. भूषण गवई यांच्या व्यक्तीवर झालेला नसून भारतीय संविधानावर केलेला हल्ला आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रेमकुमार बोके यांनी केला आहे.
प्रा. बोके म्हणाले की, “भूषण गवई हे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सरन्यायाधीश पदावर पोहोचले आहेत. भारतीय संविधान आणि लोकशाहीवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. मात्र वर्णवर्चस्ववादी लोकांना त्यांच्या या पदावर पोहोचणे सहन झालेले नाही.”
त्यांनी पुढे म्हटले की, “मनुस्मृती समर्थकांना बहुजन समाजातील व्यक्ती मोठ्या पदावर गेल्याचे पाहवत नाही. त्यामुळे वेळोवेळी उच्च पदावरील बहुजनांचा अपमान केला जातो. न्या. भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले, तेव्हाही प्रोटोकॉलनुसार कोणताही वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आला नव्हता. तोही अपमानकारक प्रकार होता.”
“जातीचा अहंकार बाळगून असलेल्या मनुवाद्यांना बहुजन समाजातील व्यक्ती कितीही विद्वान, बुद्धिवान असला तरी ते मान्य होत नाही. त्यामुळेच अशा जातीय विकृतीतून दुर्दैवी घटना घडतात,” असे बोके यांनी नमूद केले.
या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून, अशा जातीयवादी प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रतिकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

