नगरसेवक राज पाटील यांचा प्रशासनावर प्रभाव; रेशन कार्ड कामकाजाला वेग

-शंतनू इंगळे (प्रतिनिधी) अचलपूर:
अचलपूर शहरातील प्रभाग क्रमांक ७ छत्रपती शिवाजी महाराज येथील खिरणी बगीचा परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून भेडसावत असलेल्या राशन कार्डच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला आहे. नवीन राशन कार्ड काढणे तसेच कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. या त्रासामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही बाब लक्षात येताच अचलपूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा मनसे अमरावती जिल्हाध्यक्ष राज पाटील यांनी तातडीने पुढाकार घेत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. खिरणी बगीचा परिसरातील बाधित नागरिकांना स्वतःसोबत घेऊन त्यांनी पुरवठा विभागाचे अधिकारी केदार साहेब यांच्यासोबत सखोल व सकारात्मक चर्चा केली. या चर्चेदरम्यान नागरिकांच्या अडचणी, प्रशासकीय विलंब आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज पाटील यांनी प्रशासनासमोर स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, अन्नसुरक्षा योजनेचा लाभ हा प्रत्येक पात्र नागरिकाचा हक्क असून केवळ कागदोपत्री अडचणींमुळे तो नाकारला जाणे अन्यायकारक आहे. त्यांच्या ठाम आणि अभ्यासपूर्ण मांडणीला पुरवठा विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
या चर्चेनंतर दिनांक २० जानेवारी २०२६ पासून पुढील आठ दिवसांच्या आत खिरणी बगीचा परिसरातील पात्र नागरिकांचे नवीन राशन कार्ड तयार करून देण्यात येतील, तसेच प्रलंबित नावनोंदणीचे कामही पूर्ण करण्यात येईल, असा ठोस निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे खिरणी बगीचा परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. “नागरिकांच्या प्रश्नासाठी थेट मैदानात उतरून प्रशासनाशी संवाद साधणारा नेता” अशी ओळख राज पाटील यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, प्रशासनावर केवळ टीका न करता उपाय सुचवणारे आणि परिणाम मिळवून देणारे नेतृत्व म्हणून राज पाटील यांचे कार्य शहरात विशेष लक्षवेधी ठरत आहे. खिरणी बगीचा परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या प्रयत्नाबद्दल आभार व्यक्त करत “आमच्या प्रश्नासाठी उभा राहणारा नेता” अशी भावना व्यक्त केली आहे.

