मंगलवाडी येथे वृक्षारोपणाने साजरा झाला जागतिक पर्यावरण दिन!
सजिव सृष्टिकरीता शुध्द हवा आणि पाणी हे दोन घटक अति महत्वाचे!
रिसोड : सजिव सृष्टिकरीता शुध्द हवा आणि पाणी हे दोन घटक अति महत्वाचे आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या 25 वर्षापासुन हवामानामध्ये नको ते बदल होतांना आढळुन येत आहेत. बदलत्या हवामानाचा दुष्परिणाम दरवर्षी वाढणारे तापमान तसेच अवेळी प्रकट होणाऱ्या पावसाच्या रूपाने दिसत आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटी सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरीने अक्षरशः श्रावण महिन्याची जाण करून दिली. आजचे प्रदुषित पर्यावरण हे बदलत्या हवामानाचे अनौरस अपत्य आहे, असे म्हणने वावगे होणार नाही.
शुध्द हवामानाची निर्मिती वृक्षाशिवाय होऊ शकत नाही!
भविष्यकाळात सदर्हु अपत्य वाढीस लागले अर्थात वाढत गेले तर संपुर्ण विश्वाला ह्याचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हि काळ्या दगडावरील रेघ आहे. त्यामुळे वेळीच ह्या गंभीर बाबीची दखल घेत केवळ मोबाईल किंवा कागदावर जागतिक पर्यावरण दिन साजरा न करता, प्रत्येकाने दरवर्षी कमीत-कमी 1 वृक्ष लावून साजरा करावा. असे निवेदन वृक्षमित्र गजानन मुलंगे ह्यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन रिसोड – मंगलवाडी रोड स्थित वारकरी गुरूकुल आश्रम मंगलवाडी येथे वृक्षारोपणाचे कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी विनोद वाळके सरपंच, मिलिंद लोणकर ग्रामसेवक ग्राम पंचायत मंगलवाडी, आश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.धनंजय मोरे महाराज, व्यवस्थापक श्रीराम जाधव, ह.भ.प.सोपान महाराज, प्रितेश वानखेडे वनरक्षक प्रादेशिक वनविभाग वाशिम परिक्षेत्र रिसोड, विठ्ठल सारोळकर मु्ख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय रिसोड, वनमजुर परशराम तनपुरे, प्राध्यापक शंतनु मोरे, श्रीकांत काळदाते, मुख्याध्यापक मदन चौधरी ईत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान धार्मिकतेचे अधिष्ठान असणार्या वड, उंबर, बेल, चिंच, जांभुळ ह्यासोबतचं जलदगतीने वाढणाऱ्या व वैरण देणार्या 1000 सुबाभळीचे सुध्दा रोपण करण्यात आले. प्रत्येक व्यक्ति आपल्या मुला-बाळाच्या उज्वल भवितव्याकरीता वारेमाप धन- दौलत जमा करण्याच्या नादात गुंतला आहे. पण ह्याला शाश्वत विकास म्हणता येणार का? तर मुळीच नाही. सुदृढ शरीर आणि आनंदी मन ह्यांच्या विकास अर्थात शाश्वत विकास होय. पण हे वातावरणातील शुध्द हवामानाशिवाय शक्य नाही. आणि शुध्द हवामानाची निर्मिती वृक्षा (Tree) शिवाय होऊ शकत नाही, हे तेवढेच खरे!
‘करूया पर्यावरणाचे रक्षण’
‘थांबवू या पुढील पिढीचे भक्षण’
या घोषवाक्याची सार्थकता आमलात आणण्याकरिता प्रत्येकाने दरवर्षी कमीत-कमी 1 वृक्ष लावणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता प्रतिक्षा मुलंगे, विशाखा मोरे, वैष्णवी मोरे. ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.

