मोरबाग येथे प्लास्टिक जप्तीची मोठी कारवाई
कोल्हापुरातील महादेवी हत्तीणला वनतारामध्ये पाठवलं होतं. यानंतर कोल्हापुरातील नागरिकांन रस्त्यालत येत मोठं आंदोलन केलं होता. यानंतर वनतारानं महादेवी हत्तीण परत करण्याचं ठरवलं आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या काळजाचा विषय ठरलेल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीबाबत मोठा निर्णय झाला. राज्य सरकार, मठ प्रशासन आणि वनतारा हत्ती संगोपन केंद्र सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. तसंच कोल्हापुरातील नांदणी इथं वनताराचं उपकेंद्र सुरू करणार असल्याची घोषणा वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी केली.
बुधवारी दुसऱ्यांदा वनताराची टीम कोल्हापुरात आली होती. यावेळी कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महादेवी हत्तीणला वनतारामध्ये ज्या सुविधा मिळाल्या त्याच सुविधा इथेही मिळतील, असा विश्वास यावेळी वनताराचे सीईओ विहान करणी यांनी व्यक्त केला. तर उद्योगपती अनंत अंबानी यांनी कोल्हापूरकरांच्या भावना दुखावणार कोणतेही वर्तन वनतारांकडून होणार नाही याची काळजी घेऊ, असं सांगितल्याचंही यावेळी सीईओ विहान करणी यांनी सांगितलं.
आम्ही एकत्र पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांच्यासह वनताराची टीम सायंकाळी पाचच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापुरातील दसरा चौकात असणाऱ्या दिगंबर जैन बोर्डिंग इथं नांदणीच्या स्वस्तश्री जिनसेन पठारक भट्टाचार्य मठाचे अधिपती, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, सागर शंभूशेट्टे यांच्या उपस्थितीत सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत मठ प्रशासन वनतारा यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना वनिताराचे सीईओ विहान करणी म्हणाले, “आम्ही स्वामीजींजवळ आलो आहे. त्यांनी विनंती केली की महादेवी हत्तीणसाठी आम्ही नांदणी इथं घर बांधू. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही प्राण्यांच्या सेवेसाठी सर्व काही करतो आहे. नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनतारा आम्ही तिघं मिळून न्यायालयात जाऊन संयुक्तिक पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
अनंत अंबानींनी घेतला ‘हा’ निर्णय : “कोल्हापूरकरांच्या भावना दुखावणारं वर्तन करणार नाही. महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये ज्या सेवा मिळतात त्याच सेवा नांदणी मठात मिळतील, असा विश्वास करणी यांनी व्यक्त केला. तर मठाधिपती यांनी बोलताना कोल्हापूरकर आणि नांदणीकरांची लाडकी महादेवी उर्फ माधुरी लवकर कोल्हापुरात येईल यासंदर्भात चर्चा झाली आहे. महादेवी हत्तीणीचे सर्व अधिकार हे नांदणी मठाकडं राहतील. महादेवी हत्तीणीला सेवा आणि उपचार करणं ही वनताराची जबाबदारी आहे”, असं त्यांनी सांगितलं
हा जनतेचा विजय आहे : “नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा केंद्राकडं नेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात अंबानींविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या लढ्यानं लोक चळवळ उभी केली. आज काही सकारात्मक निर्णय झालेत. ही कोल्हापूरकरांची ताकद आहे. त्यामुळंच एवढ्या मोठ्या ताकदीला सुद्धा आपण हरवू शकलो. कोल्हापूरचे सर्वच नागरिक हिंदी केसरी आहेत. कुस्तीत हिंदकेसरी पैलवान कुस्ती जिंकतात, सोशल मीडियावरती अनेकांचे अकाउंट ब्लॉक केले जात आहेत. त्या सर्वांसोबत आम्ही आहोत. जर ते बंद झालं नाही तर आम्ही त्यांच्यासोबत राहून लढा उभा करू. महादेवी हत्तीणी संदर्भात न्यायालयात लढा असणाऱ्या तिन्ही पार्टीच्या वकिलांची गुरूवारी मुंबईत बैठक होणार आहे. वनताराचे वकील, नांदणी मठाचे वकील आणि राज्य सरकारचे वकील यांच्यात संयुक्त बैठक होईल,” असं माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टींना खांद्यावर घेऊन विद्यार्थ्यांचा जल्लोष : वनतारा प्रशासन आणि नांदणी मठाधिपती यांच्यात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर महादेवी हत्तीण परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला. तर विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळं परिसर दणाणून गेला.
सर्व कोल्हापूरकरांचं अभिनंदन! महादेवी हत्तीणीच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापूरातील लोकांच्या एकजूटीचा आणि लोकभावनेचा आहे. या सामूहिक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचं मनःपूर्वक आभार. माधुरीला कोल्हापुरात पुनर्वसन करण्याचा वनतारा व्यवस्थापनेच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो, विधान परिषद गटनेते, आमदार सतेज पाटील

