घोगरे कुटुंबीयांचा अनोखा आदर्श;आईच्या तेरवीला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

-सचिन इंगळे (प्रतिनिधी)अंजनगाव सुर्जी : समाजात दु:खद प्रसंगी अनेक लोक विविध धार्मिक विधी आणि रूढी परंपरांवर लाखो रुपये खर्च करतात. मात्र, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगरे कुटुंबीयांनी एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे. अंजनगावातील नामाकींत शाळेचे प्राचार्य विकास घोगरे यांनी आपल्या आईच्या निधनानंतर तेराव्याचा विधी करतांना त्यांनी कोणताही अनावश्यक खर्च टाळून, त्या पैशातून स्व. दिगंबरराव पेटकर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आईला खरी श्रद्धांजली वाहिली.
घोगरे कुटुंबातील सुशिला गुलाबराव घोगरे यांचे नुकतेच दि. २५ जुलैला निधन झाले. त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम स्थानिक सिध्देश मंगल कार्यलयात दि.६/८ बुधवारला होता. अशावेळी समाजामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेवणावळी किंवा इतर खर्च केले जातात. परंतु, घोगरे कुटुंबातील सदस्यांनी, विशेषतः विकास घोगरे व त्यांच्या पत्नी स्मिता घोगरे हे मराठा सेवा संघ जिजाऊ बिग्रेडचे व सामाजिक चळवतील कार्यकर्ते असल्याने त्यांनी हा सर्व खर्च टाळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनात एक वेगळीच कल्पना होती. आईच्या नावाने असा खर्च करण्यापेक्षा तो पैसा समाजातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी वापरला तर तीच आईला खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांना वाटले.
त्यानुसार, त्यांनी स्व दिगंबरराव पेटकर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय दप्तरे, वह्या, पेन, पेन्सिल, कंपासपेटी अशा अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप व विद्यार्थांना जेवन दिले . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आणि त्यांच्या शिक्षणातील अडचणी काही प्रमाणात दूर झाल्या.
घोगरे कुटुंबीयांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी केवळ एका व्यक्तीच्या निधनानंतरची एक पारंपरिक विधी पार पाडली नाही, तर त्या माध्यमातून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. दु:खद प्रसंगातही सामाजिक भान ठेवून केलेल्या या कार्यामुळे अनेक लोकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. आपल्या आईच्या नावाने केलेला हा सामाजिक उपक्रम तिच्या स्मृती चिरंतन ठेवेल, अशी भावना कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली.
या अनोख्या उपक्रमामुळे घोगरे कुटुंबीयांनी समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे की, पारंपरिक विधींपेक्षा सामाजिक कार्य आणि गरजूंची मदत करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजातील इतर लोकही असेच चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहित होतील अशी आशा व्यक्त होत आहे.

