महाराष्ट्र

रोजगाराअभावी अंजनगाव सुर्जीतील तरुणांचा बाहेरचा रस्ता; गावांची धडधड मंदावतेय

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सुशिक्षित तरुण पिढी आज रोजगाराच्या प्रश्नामुळे मोठ्या संकटात सापडली आहे. पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करूनही स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने अनेक युवकांना आपले गाव, आपली माती सोडून परजिल्हा व परराज्यात स्थलांतर करावे लागत आहे. ही स्थिती केवळ बेरोजगारीची नसून, तालुक्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनावर दूरगामी परिणाम करणारी ठरत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील अनेक गावांमधून तरुण मोठ्या प्रमाणावर कामाच्या शोधात बाहेर पडत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक यांसह गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेशातील औद्योगिक शहरांकडे युवकांचा ओघ वाढला आहे. काहीजण खासगी कंपन्यांमध्ये अल्पवेतनावर काम करत आहेत, तर काहीजण कंत्राटी मजुरी किंवा अस्थिर नोकऱ्यांवर अवलंबून आहेत. शिक्षणावर केलेला खर्च आणि मेहनत अपेक्षित फळ देत नसल्याची खंत अनेक तरुण व्यक्त करत आहेत.
स्थानिक युवकांच्या म्हणण्यानुसार, “शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावात नोकरी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तालुक्यात उद्योगधंदे नाहीत, प्रशिक्षणाच्या संधी नाहीत. शेतीपूरक व्यवसायही मर्यादित आहेत. त्यामुळे इच्छा नसतानाही शहरांकडे जावे लागते.” अनेक कुटुंबांमध्ये तरुण घराबाहेर गेल्याने वृद्ध आई-वडील गावात एकटे पडत असल्याचेही वास्तव समोर येत आहे.
अर्थतज्ज्ञ व सामाजिक अभ्यासकांच्या मते, अंजनगाव सुर्जी तालुक्यात औद्योगिक गुंतवणूक आणि कौशल्याधारित रोजगार निर्मितीचा अभाव हे बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. शिक्षण आणि रोजगार यातील दरी दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागातील सुशिक्षित मनुष्यबळ शहरांच्या विकासात सामील होत आहे, मात्र गावांचा विकास मात्र खुंटतो आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठ, लघुव्यवसाय आणि सेवा क्षेत्रावरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या स्थलांतराचा सामाजिक परिणामही गंभीर स्वरूपाचा आहे. गावातील सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, युवक मंडळांचे उपक्रम यामध्ये सहभाग कमी होत आहे. तरुणांची ऊर्जा आणि नेतृत्व गावाबाहेर गेल्याने सामाजिक चैतन्य कमी होत चालले आहे. काही गावांमध्ये तर युवकांचा अभाव जाणवू लागल्याने ग्रामविकासाचे कामही संथ झाले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि जाणकारांकडून ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे. तालुक्यात लघुउद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, कृषीआधारित उद्योग, तसेच आधुनिक कौशल्यविकास केंद्रे सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. युवकांच्या शिक्षणानुसार प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराकडे वळविणे, तसेच डिजिटल माध्यमातून रोजगार मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देणे काळाची गरज ठरत आहे.
स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून दीर्घकालीन धोरण आखले, तरच तालुक्यातील सुशिक्षित युवकांना आपल्या गावातच भविष्य घडवण्याची संधी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अन्यथा, रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर थांबणार नाही आणि गावांची ओळख हळूहळू रिकामी होत जाण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.