भाजपाला युती करायचीच नव्हती, निलेश राणेंचा कणकवलीत दावा; शिंदे-ठाकरेंचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर
खासदार नारायण राणे अद्यापपर्यंत युतीसाठी आग्रही आहेत. आता युती होईल, असं वाटत नाही, त्यांनी आता थांबू नका. तुमचाही मोठा पक्ष आहे, असं निलेश राणेंनी सांगितलंय.

सिंधुदुर्ग: आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही. त्यांना आमच्यासोबत युती करायची नव्हती, ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे, त्यांच्यासोबत युती झाली. म्हणून मी प्रचारासाठी कणकवलीमध्ये आलोय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर दिसले.
आता युती होईल, असं वाटत नाही : आमची स्टार प्रचारकांची 40 जणांची यादी आहे, कोणीही येऊ शकतात. आम्ही शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी सक्रिय झालो आहोत. जिल्ह्यात युती होऊ नये म्हणून बाहेरून विरोध होता जिल्ह्यातून नव्हता. खासदार नारायण राणे हे अद्यापपर्यंत युतीसाठी आग्रही आहेत. आता युती होईल, असं वाटत नाही आणि नारायण राणे आता तुम्ही थांबू नका. तुमचाही मोठा पक्ष आहे, असं त्यांनी सांगितलंय.
नारायण राणे युती तोडणार, अशी प्रतिक्रिया ऐकली नाही : वेळोवेळी किती लोकांनी प्रयत्न केले, किती दिवस आणि किती बैठका घ्यायच्या, त्याला काही तरी मर्यादा आहेत. जे उत्तर आलं ते समाधानकारक नाही. शिवसेनेला जिथे चांगलं वातावरण आहे, तिकडे आम्ही उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि इतर तीन ठिकाणी शिवसेनेचा झेंडा लागणार असून, नारायण राणे युती तोडणार, अशी प्रतिक्रिया ऐकली नाही, असं राणे काही बोलले नाहीत. नारायण राणे आणि शिंदेंची परवानगी घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत. शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी जेवढं योगदान द्यायचं आहे, तेवढं आम्ही देणार आहोत, असंही निलेश राणे म्हणालेत.
खरं तर हा पॅटर्न राज्यभर देखील होऊ शकतो : तसेच संदेश पारकर जिकडे बोलावतील तिकडे प्रचारासाठी यावं लागणार असल्याचंही निलेश राणे म्हणालेत. खरं तर हा पॅटर्न राज्यभर देखील होऊ शकतो. शहर विकास आघाडीसंदर्भात जो निर्णय झाला तो वरिष्ठ पातळीवरून झालेला आहे. जिल्ह्यातून झालेला नाही. नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नातं हे नातं असतं, ते तुटत नाही आणि तुटणारही नाही. भाजपाच्या वरच्या पातळीवरून सर्व निर्णय घेण्यात आलेत. नारायण राणेंना सांगून निर्णय घेतल्याचंही निलेश राणेंनी अधोरेखित केले.
कार्यकर्त्यांना गरज भासल्यास आम्ही स्वबळाचा नारा देऊ : कणकवली शहर हे 21 व्या शतकातील असल्यासारखं दिसलं पाहिजे. मागच्या 10 वर्षांत शहरानं जे बघितलं त्यापेक्षा चांगलं काय देऊ शकतो, आमचा तो प्रयत्न राहणार आहे. कार्यकर्त्यांना गरज भासल्यास आम्ही स्वबळाचा नारा देऊ. शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपाबरोबर युती न करण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून झाल्याचंही त्यांनी सांगितलंय.

