गणेशोत्सवाच्या काळात मंडळानी नियम पाळूनही पोलिसांकडून त्रास दिला जातोय: आदित्य ठाकरेंच्या लक्षवेधीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना पोलिसांकडून नाहक त्रास देण्यात येत असल्याचा मुद्दा आज अधिवेशनात आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिले.

मुंबई : पावसाळी अधिवेशनात आज विधानसभेतील सभागृहात लक्षवेधी मांडताना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील सण, उत्सव काळात विकाकारण पोलीस मंडळांना त्रास देतात. महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र आणि दहीहंडी या प्रमुख सणांच्या काळात सार्वजनिक मंडळांना होणाऱ्या त्रासावर आमदार आदित्य ठाकरेंनी लक्षवेधीद्वारे सूचना मांडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.
संबधितावर कारवाई करणार का? : “भोंग्यांचं ठीक आहे, मात्र आमच्या गणेशोत्सव, नवरात्र उत्सवाची मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी. गणपती, नवरात्र आणि दहीहंडी सण येणार आहेत. पहिल्या दिवशी आणि दहाव्या दिवशी ज्या काही मिरवणुका होतात, तात्पुरते धार्मिकस्थळ निर्माण होतात. अनेकदा मी पाहतो, स्थानिक पोलीस स्टेशनमधून मंडळांना सतावलं जाते, परवानगी असतानाही सतावलं जाते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, जर मंडळांनी डेसिबल पातळीचं पालन केलं असेल आणि सर्व परवानग्या असतील, तर त्यांना त्रास दिला जाणार नाही, याची मुख्यमंत्र्यांनी खात्री द्यावी. तसेच, जर असं सतावलं गेलं, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल,” असं आश्वासन द्यावं अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसाकडून त्रास दिला जाणार नाही : अनधिकृत भोंग्यांच्या नियमांचं पालन करण्याबरोबरच, गणेशोत्सव आणि नवरात्रीतील मिरवणुका आणि तात्पुरत्या धार्मिकस्थळांच्या परवानग्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून मंडळांना त्रास दिला जात असल्याचा आदित्य ठाकरे यांनी मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “निश्तिच याबाबत चौकशी केली जाईल आणि सण, उत्सव काळात मंडळांना पोलिसांकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्रास होणार नाही. याची सरकार खबरदारी घेईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आमदार आदित्य ठाकरेंना दिली.

