भाजपमधून राणांची हकालपट्टी होणार? अमरावतीच्या राजकारणात काय घडतंय? जाणून घ्या

अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपविरोधात खुलेआम भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आलाय, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तसं पत्र देखील लिहिलं आहे, तसंच नवनीत राणांना पक्षातून काढण्यात यावं अशी मागणी देखील या पत्राद्वारे करण्यात आलीय.
अमरावतीमधील भाजप कार्यकर्त्यांनी नवनीत राणांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केलीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित राणांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवा अशी मागणी करण्यात आली, अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. युती असताना देखील स्वाभीमानी पक्षानं भाजपविरोधात उमेदवार दिले होते, तसंच नवनीत राणांनी भाजपचा प्रचार न करता पती रवी राणांना साथ दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पराभूत उमेदवारांनी नवनीत राणांविरोधात तक्रार केल्याचं भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.. अमरावतीमध्ये कोणी भाजपविरोधात काम केलं? हे तपासण्यासाठी एक टीम पाठवण्यात येणार असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय.
अमरावती महापालिकेत भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत, यावरून यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर टीका केलीय. कार्यकर्त्यांना मोठं केल नाही म्हणून भाजपचा पराभव झाल्याचं म्हणत यशोमती ठाकूरांनी नवनीत राणांना टोला लगावला, तर यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसची काळजी करावी असं म्हणत नवनीत राणांनी देखील पलटवार केलाय.
भाजप नेत्यांनी केलेल्या मागणीनंतर नवनीत राणांनी त्यावर चुप्पी साधलीय. तसंच बावनकुळेनी पाठवलेल्या टीमच्या अहवालात नवनीत राणा दोषी आढळल्यास पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे देखील पाहावं लागणार आहे.

